मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपच्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार असून पक्षाकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात आहे. तसेच त्याबद्दल राज्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असल्याचेही समजत आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनात याची घोषणा केली जाऊ शकते.
एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार असून त्याजागी अनेक पक्षांकडून नावांची चाचपणी सुरु आहे. पण भाजपकडे मोठे संख्याबळ असल्यामुळे काही उमेदवारांना विधान परिषदेवर पाठवले जाण्याची शक्यता असून त्यासाठी पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. पंकजा यांचा विधानसभा निवडणुकीत परळी मारतदारसंघातून पराभव झाला असून राज्याचे लक्ष लागले असताना मात्र त्यांचा चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडूनच त्यांना पराभव प्राप्त झाला आहे. नंतर आपल्याच लोकांनी दगाबाजी केली असल्याचा आरोप पंकजा यांनी करत त्या पक्षावर नाराजही झाल्या होत्या.
दरम्यान त्यांच्या पक्षांतराच्या अफवाही होती. नंतर त्यांनी पक्षातील नाराज असलेल्यांसह भगवानगडावर जाऊन मेळावा घेत पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पंकजा यांच्या नाराजीची गंभीर दखल घेतली असल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडे या भाजपमधील आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात असून त्यांनी अनेक वर्षं आमदारकी निभावली आहे. तसेच राज्यात पाच वर्षे मंत्रिपदही भूषवले आहे, त्यामुळे त्यांना संसदेच्या कामाचा अनुभव आहे. याच अनुभवाचा फायदा पक्षाला विधान परिषदेत होईल, असे भाजपचे मतं आहे.