नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून केंद्र सरकारवर परत एकदा हल्ला चढवला असून गंभीर आरोप केले आहेत. देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असूनही त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जात आहेत. तर आसाममध्य एनआरसीमुळे आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला असून पश्चिम बंगालमध्ये एनआरसीच्या भीतीनेच ३० जणांचा मृत्यू झाला आहे, असा दावा ममता यांनी केला आहे.
नदिया जिल्ह्यातील आयोजित केलेल्या एका सभेदरम्यान ममता बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. त्यांनी भाजपवर आरोप करत भाजपशी सहमत असलेल्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपकडून सध्या राबवला जात आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच देशात आधीच सीएए आणि एनआरसीवरून आंदोलनांचा वणवा भडकलेला असून आता ममता यांच्या या आरोपाने आंदोलनाला वेगळे वळण लागू शकते.
जे लोकं द्वेष पसरवतात त्यांच्याशी मी कोणतेही नाते ठेवत नाही असे सांगत कुणी तुमच्याकडे कागदपत्रे मागितली तर ती दाखवू नका, असे आवाहनच त्यांनी केले. तुम्हाला आधारकार्ड जमा करायला सांगितले जाईल. तसेच तुमच्या कुटुंबाचा तपशीलही मागितला जाईल, पण मी सांगत नाही तोपर्यंत कुणाकडेही असा दस्तावेज सादर करू नका, असे ममता म्हणाल्या आहेत. तर केंद्र सरकारने आणलेली नवीन कररचना ही लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.