लातूर : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या महाराष्ट्रातील ४० युवकांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला परिवहन महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले असून, महामंडळाच्या नोकरभरतीत यासंदर्भात प्रक्रिया केली जात असल्याची माहिती आ. डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने लातूर येथे आयोजित सन्मान सोहळ्यानिमित्त आल्यानंतर आ. डॉ. तानाजीराव सावंत यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी अ. भा. छावा मराठा संघटनेचे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील, भगवान माकणे, विजयकुमार घाडगे पाटील, महेश डोंगरे यांची उपस्थिती होती. आ. डॉ. सावंत यांनी मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळणे आता शक्य नसल्याचे नमूद करून हे पाणी प्रत्यक्षात येण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांना ठिबक सिंचन १०० टक्के मोफत देऊन पूर्ण अनुदान दिले पाहिजे. तीन वर्षांनंतर हे अनुदान बंद करावे. तसेच शेती उत्पादनाच्या दीडपट हमीभाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे. असे झाले तर शेतमालाचे उत्पन्न ऊसपिकाकडे जाईल व शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, अशी मागणी केली.
या प्रसंगी छावाचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी ॲट्रॉसिटी कायद्यामुळे समाजा-समाजात वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे हा कायदा रद्द करावा, अशी मागणी केली. यापुढे आपली लढाई ही शेतकऱ्यांसाठी असेल, असा निर्धार जावळे-पाटील यांनी व्यक्त केला.