वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात एकदिवसीय ओबीसी चिंतन शिबिर नुकतेच पार पडले. या ओबीसी चिंतन शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी केले. याप्रसंगी ओबीसी सेवासंघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी आता सर्वच राजकीय पक्षांना ओबीसींच्या न्याय हक्काबाबत विचार केल्याशिवाय पर्याय नाही. ओबीसी समाजाची सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या एक ओळख आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा, शिष्यवृत्तीचा प्रश्न या माध्यमातून एकजूटीने पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी आपल्या खास शैलीत ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा केली.
ओबीसींच्या एकजूटीवरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. दिलीप धावडे, ॲड. हिराचंद बोरकुटे, बळीराम धोटे, प्रमोद काळबांडे, श्याम झाडे, प्रा. नामदेव जेगंठे, प्रा. दिवाकर गमे, प्रशांत तांबे, प्रदीप दाते, बाबा बिडकर, अस्मिता राजूरकर, सुधीर जिंदे, निळकंठ पिसे यांच्यासह विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी ओबींच्या विविध प्रश्नांची चर्चा, वर्तमानातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
या चिंतन शिबिराची भूमिका डॉ. अशोक चोपडे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन गुणवंत डकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार कपील थुटे यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय राजेंद्र कळसाईत यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अज्य भेंडे, सुधीर गवळी, प्रा. जनार्दन देवतळे, गिरीधर कोठेकर, अजय इंगोले, विनय डहाके, विद्या कळसाईत, स्मीता वानखेडे, मिरा इंगोले, अजय तिगावकर, प्रभाकर पाटील आदींनी सहकार्य केले.