यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – ओबीसींना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जागृत करण्यासाठी १२ फेब्रुवारीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रोतृ सभागृहात ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती ओबीसी आरक्षण बचाव समितीच्यावतीने विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
ओबीसींना मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ५२ टक्के आरक्षण घोषित केले आहे. न्यायालयाने ५० टक्केच्यावर आरक्षण देता येणार नाही, अशी अट घातली आहे. त्यामुळे ओबीसींवर नाहक अन्याय झाला आहे. मात्र केंद्र सरकारने सवर्णांना १० टक्के आर्थिक निकषावर आरक्षण दिले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्घ ते असूनही तत्काळ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींनाही ५२ टक्के आरक्षण लागू करण्याची अंमलबजावणी करावी, जातनिहाय जणगणना करावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा, १०० टक्के स्कॉलरशीप द्यावी, केंद्रीय बजेटमध्ये ५२ टक्के आर्थिक तरतूद करावी, दादासाहेब सबलीकरण योजनेतून जमिनी द्याव्या, सर्व शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन द्यावी, विदेशात उच्च शिक्षणासाठी शासकीय खर्च द्यावा, यवतमाळ जिल्ह्यातील आरक्षण १४ टक्केऐवजी १९ टक्के करावे आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत माजी आ. प्रकाश अण्णा शेंडगे, आ. हरीभाऊ राठोड, श्रावण देवरे, बालाजी शिंदे, अरुण खरमाटे आदी मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. याप्रसंगी प्रदीप वादाफळे, डॉ. दिलीप घावडे, उत्तम गुल्हाणे, डॉ. दीपक शिरभाते, रमेश गिरोलकर, विलास काळे, राहुल पाटील, प्रकाश फेंडर, बाबूसिंग कडेल, संजय राठोड, नामदेव जयसिंगपुरे, ॲड. राजेंद्र महाडोळे आदी उपस्थित होते.