बहुजननामा ऑनलाईन – येणाऱ्या निवडणुकीत आता राजकीय पक्ष म्हणून स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘एमआयएम’ने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर माझ्या मनात काहीच कटुता नाही असे स्पष्ट मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.
अलुतेदार- बलुतेदार सत्ता संपादन मेळावा जालना येथे घेण्यात आला होता. यावेळी सुभेदारी विश्रामगृहात अॅड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी सोबत एमआयएमची युती तुटल्याने वंचित बहुजन आघाडीला कोणतेही नुकसान होणार नाही. एमआयएमच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा. तसेच माझ्या सोबत खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील. ”
खासदार जलील यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याभोवती ‘आरएसएस’चे कोंडाळे असल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना आंबेडकर म्हणाले, भान ठेऊन जर टीका केली तर त्याचे वजन राहते. नाहीतर मतदार सुद्धा अशा टीकांचा विचार करत नाही. तुम्ही फक्त टीका करत राहा, परंतु आम्ही मात्र जे निर्माण करायचे आहे ते करत राहू.