बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल का प्रेम उफाळून आले? असा संतप्त सवाल देखील केला आहे.
आमदार थोरात म्हणाले, ” ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढली आहे. इतर वेळी भारतीय जनता पक्षातले नेते पाकिस्तानवर टीका करतात आणि आता पाकिस्तानचा कांदा आयात करायचा निर्णय घेतला आहे. यामागेही राजकारण भारतीय जनता पक्षातले नेते करत आहेत. जर पाकिस्तानातून कांदा आयात केला तर याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. याचा विचार मात्र ते करत नाहीत. यावरून लक्षात येते की भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून, यांना केवळ आणि केवळ व्यापाऱ्यांचीच चिंता आहे.
पाकिस्तानचा कांदा आणून आपल्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येणार असताना पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची काय गरज आहे ? अलीकडे तर भाजपने आणि त्यांच्या समर्थकांनी कोणीही पाकिस्तानबद्दल काहीही बोलले तर लगेच त्यांना पाकिस्तान समर्थक ठरवले जायचे. प्रत्येकवेळी पाकिस्तानच्या नावाने ओरडणाऱ्या भाजपाला पाकिस्तानचा कांदा कसा काय चालतो ? असे अनेक प्रश्न आमदार थोरात यांनी उपस्थित केले.