मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत काही नाराजी समोर आल्याच्या चर्चा होत्या. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सर्व अफवा असल्याचे म्हणत अफवावर विश्वास ठेवू नका, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीत 5 वर्षे पूर्ण करणार. शरद पवार यांचे सरकारला आशिर्वाद आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर भाजपा नेते नितेश राणे(nitesh rane) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाविकास आघाडीच सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर, राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात 5 तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ही राजभवनातली की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी द्यावी, असा टोलाही नितेश राणेंनी(nitesh rane) लगावला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर..
राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात ५ तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत?
राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी!!— nitesh rane (@NiteshNRane) May 27, 2021
खासदार संजय राऊत यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीची फाईल सापडत नसल्याने, राजभवनात भुताटकी झाली की काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला राणे यांनी अशा प्रकारे उत्तर दिले आहे. दरम्यान कोरोनाच्या काळामध्ये सरकार पडण्याच्या चर्चांना काही काळ आराम मिळालेला होता. मात्र कोरोनातून सावरत असल्याचं चित्र समोर यायला सुरुवात होताच पुन्हा एकदा अशा चर्चा सुरू झाल्या. पंढरपूरमध्ये सरकारचा कार्यक्रम करण्याचे फडणवीसांचं वक्तव्य. त्याचा काही दिवसांपूर्वी केलेला पुनरुच्चार. चंद्रकांत पाटलांची वक्तव्ये ही बरंच काही सांगणारी आहे. त्यात गेल्या काही दिवसांत सरकारमधील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचेही आपसांत खटके उडत आहेत. त्यामुळे आता खरेच लवकरच सरकारचा कार्यक्रम होणार का? असा सवाल अनेकांसमोर आहे.