पुणे : बहुजननामा ऑनलाईन – “राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर होत असल्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच होत आहे. कर्नाटक, राजस्थान तसेच मध्यप्रदेश मधली सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप सरकार कडून होत आहे, जे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे.” असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कर्नाटक मंत्र्यांना मुंबईत जी वागणूक दिली गेली, ती पाहता राज्यात कायदा आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत असताना दिसत आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय यांसारख्या मार्गांचा वापर होत असल्याचेही शरद पवार म्हणाले.
अन्य पक्षातील नेत्यांना देश व राज्यातील प्रमुख तपास यंत्रणांची भीती दाखवून भाजप पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. कायद्याचे उल्लंघन करून आर्थिक अडचणीत असलेल्या संस्थांच्या प्रमुखांना मदत केली जात आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे रासपचे आमदार राहुल कुल त्यांच्या पत्नी कांचन कुल याना भाजप सरकार ने बारामती मतदार संघातून निवडणूक लढवायला लावली. कुल यांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याला सरकारने आर्थिक मदत केली आणि निवडणूक लढवण्यासाठी पुढाकार दिला.
सोलापूरचे कल्याणराव काळे यांनादेखील कायद्यांचे उल्लंघन करून मदत केली, त्यामुळे त्यांनादेखील भाजप सरकारचा आसरा घ्यावा लागला. लोकप्रतिनिधींना भडकवण्यासाठी प्रमुख तपास यंत्रणांचा धाक दिला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनादेखील भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. चित्र वाघ यांना देखील चौकशीच्या जाळ्यात अडकविले जात आहे. त्यामुळे चित्र वाघ देखील घाबरल्या आहे. त्यांनी मला भेटून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आम्ही त्यांना काही मदत करू शकत नसल्याचंही पवारांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्यानं ते पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश करत आहे. निवडणूक लढवण्यासाठी मोठया नेत्यांच्या संस्थांना मदत केली जात आहे. हसन मुश्रीफ याना भाजपात येण्याचं सांगण्यात आलं आहे, परंतु त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर प्राप्तिकर विभागामार्फत छापा टाकण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला.