अकोला बहुजननामा ऑनलाईन – भारतीय संविधानाचा सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन करण्यासाठी तसेच मूलनिवासी समाजाला भारताचा शासनकर्ता बनविण्यासाठी देशभरात पीपल्स पार्टी ऑफ इंडीया (डेमोक्रेटीक) च्या वतीने देशव्यापी महा जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे.अभियानांतर्गत येत्या २२ जुलै रोजी पार्टीच्या वतीने अकोल्यात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहे. अशी माहिती पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा (महिला विंग) इंजिनिअर निलिमा भटकर, महाराष्ट्र अध्यक्ष वसंत कोळंबे, अकोला जिल्हाध्यक्ष अरुण वानखडे, सचिव अड. नाना तायडे यांनी दिली.
२२ जूलै रोजी अकोला येथे होणाऱ्या देशव्यापी महा जनजागरण अभियानानिमित्त होणाऱ्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष बी. डी. बोरकर हे असतील. तर राष्ट्रीय अध्यक्ष महिला विंग इंजिनियर निलिमा भटकर, उपाध्यक्ष के. एस. चौहान, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मनीषा बांगर, महाराष्ट्र प्रभारी हरीश सहारे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
देशाची वर्तमान स्थिती वाईट झाली आहे. देशातील संसदीय संस्थांवर अतिक्रमण झाले आहे. भारतीय संविधानावर आक्रमण केले जात आहे. यासोबतच प्रशासनावर अतिक्रमण झालेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाहीचा एक खांब असलेल्या न्याय पालिकेवरही अतिक्रमण करण्यात आले आहे. या सर्वांवर ब्राम्हणवादी शक्तींचे आक्रमण झालेले आहे. या सर्वांना मुक्त करण्यासाठी पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने १ जानेवारी २०१९ पासून जन जागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान वर्षभर चालविले जाणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार मिळणे, त्याचे संवर्धन करणे आणि हे अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी हे अभियान देशातील ४०० जिल्हे आणि ग्रामपंचायतींमध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि धर्मांतरित अल्पसंख्याक, मूलनिवासी यांच्यासाठी राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्वांनी तन मन धनाने सामील होण्याचे आवाहन आज करण्यात आले आहे.
यावेळी विनोद मेश्राम, प्रशांत मेश्राम, संतोष गणवीर, निखिल भोंडे, मायावती तायडे, दीक्षा मेश्राम, इंजि तनुजा नेपाळे, एस. बी. मगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.