मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जय श्रीराम बोलण्याची सक्ती करणाऱ्यांना चोप देण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाज कंटकांना चोप दिला जाईल असे भीम आर्मीच्या वतीने सांगण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणाला जय श्रीराम बोलण्यास भाग पाडून मारहाण करण्यात आली होती. त्यावरून भीम आर्मीने हा इशारा दिला आहे.
भारत देशात लोकशाही जिवंत आहे. देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. आपापल्या धर्माचं स्वातंत्र्य प्रत्येकाला देण्यात आले आहे. असे असतानाही काही समाजकंटक देशातील अल्पसंख्यांकांना जबरदस्तीने जय श्रीराम बोलण्याची सक्ती करत आहेत. त्यांचा जीव घेत आहेत. याचा भीम आर्मीने निषेध केला. यापुढे जय श्रीराम बोलण्याची जबरदस्ती करणाऱ्याला भीम आर्मी चोप देणार आहे. तसेच त्याचे तोंड काळे करून गाढवावरून धिंड काढणार आहे. त्यानंतर पोलासांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिला आहे.