पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे त्यातच राज्यात दुष्काळग्रस्त भागात मंत्र्यांचे, अनेक नेतेमंडळींचे अनेक दौरे झाले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले असा खोचक सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ते साखर आयुक्त कार्यालयात आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दुष्काळाच्या मुद्दयावर सरकारने केलेल्या कामाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शेट्टी म्हणाले की, मंत्री जेव्हा दुष्काळग्रस्त भागात दौऱ्यावर जातात तेव्हा ते जात असताना अनेकदा आधीच बंदोबस्त केला जातो. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतले जाते. सध्या सुरु असलेले मंत्र्यांचे दौरे हे पोलीस बंदोबस्तात सुरु आहेत त्यावरून लोकांच्या मनात किती मोठा उद्रेक आहे हे लक्षात येते. अशा परीस्थितीत आचारसंहिता आहे हे कारण देऊन दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
महाराष्ट्रातील चारा छावण्यांमध्ये शेतकऱ्यांचे हाल सुरु असून त्या छळ छावण्या आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . अशा परिस्थितीत सरकार काय करत आहे. काय अंमलबजावणी करायची हे सर्वांना माहिती आहे. मात्र केवळ कर्तव्य टाळण्यासाठी आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे. सक्तीची बँक वसुली, विद्यार्थ्यांची फी माफ करणे या केवळ शाब्दिक घोषणा ठरल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र काहीच झालेले नसल्याचे टीका शेट्टी यांनी केली.