पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशात लोकसभा निवडणूक सुरु असून राजकीय नेते एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत त्यातच नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका केली ते म्हणाले ‘राजीव गांधी हे मिस्टर क्लीन नसून भ्रष्टाचारी नं. १ असा आरोप मोदी यांनी केला होता. याचा कॉंग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो, असे पत्र माजी आमदार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
येत्या २३ मे नंतर देशातील चित्र बदलणार आहे. जनता भाजपा सरकारला पायउतार करणार आहे तसेच सत्ताबदल झाल्यानंतर राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचार उघड होईल, या भीतीने गांगरून गेल्यामुळेच ते अशी बेछूट विधाने करीत आहेत . गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारने काय केले हे सांगून पंतप्रधान मोदी आणि भाजपने जनतेला सामोरे जायला हवे होते. मात्र, पाच वर्षात त्यांना विकास करता न आल्यामुळे वैयक्तिक खालच्या पातळीवरील टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीकाही जोशी यांनी केली.
आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या कर्तबगार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८४-८५ मध्येच देशात संगणक क्रांती करून देशासाठी बलीदान दिले, देशहितासाठी ते शहीद झाले. राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामधूनही न्यायालयाने त्यांची मरणोत्तर निर्दोष मुक्तता केली होती . हा सगळा इतिहास माहित असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर अशी टीका करून शहीदांचा अपमानच केला आहे, असेही जोशी यांचे म्हणणे आहे.