औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – महिलांवरील अत्याचार, अस्पृश्यता, जातीय भेदभाव याला कारणीभूत इथली जातिव्यवस्था आहे. आपल्या सर्व समस्यांची खरी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यास पीडित व्यक्तींना आणि शोषित समूहांना जातिव्यवस्थेमुळे अडसर निर्माण होतो. त्यामुळे जातिव्यवस्थेचे निर्मूलन करून सेक्युलॅरिझम राज्य व्यवस्था स्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेक्युलर मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात डॉ. अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. संघटनेचे कार्याध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक भरत शेळके यांनी शिबिराचे उद्घाटन केले. ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा पत्रकारितेसाठीचा मूकनायक पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. अंबादास कांबळे, सुधाकर झिने, अशोक गवई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर पहिल्या सत्रात सेक्युलर मूव्हमेंटच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. यात अरविंद निकाळजे (मुंबई) व अंबादास कांबळे यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात प्रा. विजय माकणीकर व मधू कांबळे यांनी विविध देशांत प्रचलित प्रमाणबद्ध निवडणूक पद्धतीचा तपशील मांडला.
तिसऱ्या सत्रात आधुनिक काळातील क्रांती आणि प्रतिक्रांती : सेक्युलर मूव्हमेंटचे आकलन या विषयावरील चर्चेत बबन चहांदे, प्रा. अनिल हाडगेकर व सोमनाथ माने यांनी सहभाग घेतला. अभ्यासक सतीश बनसोडे यांनी जातिव्यवस्थेचे बदलते स्वरूप, जातिव्यवस्था निर्मूलनाचा विचार आणि कृती कार्यक्रम या विषयावर मांडणी केली. ॲड. प्रकाश होवाळ तसेच प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी यावर तपशीलवार विवेचन केले. के. ई. हरिदास, भाग्यश्री पगारे, जयसिंग वाघ, डॉ. गौतम जगताप, अशोक भरणे, प्रा. भगवान धांडे यांनीही मत मांडले. विविध सत्रांत ॲड. पुष्पा घोडके, शिवाजी पानगावकर, विशाल साळवे, विश्राम राऊत, प्रा. कीर्तिलता पेटकर, सुधाकरराव झिने, रामभाऊ पेटकर, नंदकुमार जोगदंड, सुरेश भंडारे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा. अनिल हाडगेकर यांनी केले. आभार सुमेध डोके यांनी मानले. शिबिरासाठी संतोष कांबळे, अंकुश आकुस्कर, अर्जुनराव मुंडे, भास्करराव डोके, डी. बी. पालवे यांनी पुढाकार घेतला.