औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – संभाजी ब्रिगेड बहुजनवादी विचारांना पाईक आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. परंतु समविचारी पक्ष जर आम्हाला गृहीत धरत असतील तर वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे आम्ही तटस्थ राहण्यावरही ठाम आहोत. परंतु बहुतांश ठिकाणी कार्यकर्त्यांकडून लढण्याची गळ घातली जात आहे. त्यामुळे लवकरच या सर्व प्रकाराबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात लोकसभेच्या ३० जागा लढवणार असल्याची घोषणा केलेल्या संभाजी बिग्रेडने अद्याप एकही उमेदवारी जाहीर केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी ब्रिगेडची चर्चा काँग्रेस पक्षासोबत सुरू आहे. दोन दिवसांत काँग्रेसने सकारात्मक निर्णय दिला नाही, तर संभाजी ब्रिगेड भूमिका स्पष्ट करणार आहे. राज्यातील समविचारी पक्षांशी आघाडी करू इच्छिणाऱ्या संभाजी ब्रिगेडसाठी मित्रपक्षांनी अद्याप एकही जागा सोडली नाही. ब्रिगेडच्या नेत्यांची बुलडाणा, पुणे आणि आणखी एका जागेवर चर्चा सुरू होती. परंतु अद्याप त्याचा निर्णय झाला नाही. काँग्रेसने जागा सोडली नाही तर संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा मार्ग स्वीकारणार आहे. परंतु बहुतांश ठिकाणी कार्यकर्त्यांकडून स्वबळावर लढण्याची गळ घातली जात आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांशी बोलून काय निर्णय घ्यायचा याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संभाजी ब्रिगेडमधील काही नेत्यांच्या मते पक्ष स्वबळावर लढला तर बहुजन मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होणार आहे. दुसरी बाब अशी की संभाजी ब्रिगेड भाजप-शिवसेनेबरोबर जाणार नाही याची कल्पना आघाडीत पक्षांना असल्याने ते संभाजी ब्रिगेडसोबत चर्चा करण्यास इच्छुक नाहीत.