मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अनेक नेत्यांची नाराजी दिसून येत आहे. माजलगावमधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोलंकी यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. यावरून राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आता विधान केले आहे. ‘आम्ही प्रकाश सोलंकी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहोत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सगळ्यांना घेणे शक्य नाही. तेव्हा ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत’, अशी अजित पवार म्हणाले.
अनेक वर्षे पक्षात काम करत असलेल्या नेत्यांनाही डावलण्यात आले असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये नाराजी दिसून येत आहे. दुसरीकडे भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद दिले नाही म्हणून त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी काळे फ्लेक्स बनवून ते पेटवून आणि काळ्या फिती बांधून निषेधही व्यक्त केला आहे. सोबतच भोर नागरपालिकेतील २० नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देणार असल्याची घोषणा दिली असून स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे वाईमधील आमदार मकरंद पाटील यांचीही मंत्रिपदासाठी चर्चा असताना शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीतून वगळले. त्यामुळे त्यांचेही कार्यकर्ते नाराज असून पाटील समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्यासाठी शेवटच्या क्षणी यादीतून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचे नाव वगळण्यात आले असल्याने सुनिल राऊत हे पण पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
Visit : bahujannama.com