कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेच्या मंत्र्यांच्या यादीत आमदार आबिटकर यांचे नाव असल्याचे समजल्यावर रात्रीच ११:३० ला प्रमुख कार्यकर्ते प्रकाश आबिटकर यांची भेट घ्यायला निघाले. परंतु ते पनवेलला पोहोचणार तोच त्यांचे मंत्रिपद गेल्याचे समजले आणि कार्यकर्ते नाराज होऊन मागे परतले. तसेच आबिटकर यांच्यावर पक्षाने अन्याय केल्याची भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. राधानगरी-भुदरगडमधील राजकारणात आबिटकर हे मोठे होऊ नयेत, म्हणून त्यांचे मंत्रिपद वगळल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात २०१४ मध्ये शिवसेनेचे सहा आमदार होते. त्यावेळीही उद्धव ठाकरे यांनी एकालाही मंत्रिपद दिले नव्हते. कोल्हापूरला गृहीत धरले असताना त्याचे पडसाद २०१९ च्या निवडणुकीमध्ये दिसले. राष्ट्रवादीचे के.पी. पाटील यांचा पराभव करून प्रकाश आबिटकर यांनी आपली आमदारकी टिकवली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने तरी निदान कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा होती.
आबिटकर यांना मंत्रिपद मिळावे म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी प्रयत्न करून पाहिले. साताऱ्यातून शंभूराजे देसाई आणि कोल्हापुरातून आबिटकर यांचे मंत्रिमंडळातील स्थान जवळजवळ पक्के होते. मागील काही दिवस कार्यकर्ते सोशल मीडियावर ‘नामदार आबिटकर’ अशी पोस्ट टाकत होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. रविवारी रात्री कार्यकर्ते मुंबईला निघाले असताना सोमवारी सकाळी आबिटकर यांचे नाव यादीत नसल्याचे समजताच कार्यकर्ते नाराज झाले. विशेष बाब म्हणजे अपक्षमधील राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नावाची चर्चा नसताना यादीत त्यांचे नाव दिसून आले. तेव्हा त्यांच्या रूपाने कोल्हापूरला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत.
Visit : bahujannama.com