नाशिक ( बहुजननामा ऑनलाइन ) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक जण काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. काँग्रेस पक्ष संपतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने १९८० आणि १९९९ मध्ये देखील काँग्रेस पक्ष संपतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पुन्हा पक्षाने भरारी घेत सत्ता मिळविली होती. त्यामुळे पुन्हा काँग्रेस नक्कीच भरारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल थोरात यांचा नाशिक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
काँग्रेसमधून सध्या अनेक जण बाहेर पडत आहेत. यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, काँग्रेसमधून लोक बाहेर पडत असल्याची वस्तुस्थिती मान्य आहे; परंतु त्यामुळेच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये संधी मिळते आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसलाही नवी पालवी फुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे आणि काँग्रेस उमेदवाराला विजयी करावे अशा सुचना थोरात यांनी कार्यकर्त्यांना केला. आपण सध्या निवडणुकीच्या कामावर फोकस करणार असून निवडणुकीनंतर पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, असे ही थोरात यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात कोण कीती प्रामाणिकपणे काम करतो आहे,यावर आपले लक्ष असून काम करणारांनाच आगामी काळात संधी दिली जाईल. असे ही थोरात यांनी सांगितले.