नागपूर (बहुजनामा ऑनलाइन) – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्दावर मराठा समाजला टोला लगावला आहे. ‘‘एकेकाळी आरक्षणावरून आम्हाला सरकारी जावई म्हणून चिडवणारा मराठा समाज आज स्वत:च आरक्षण घेऊन सरकारी जावई झाला’’ असे आंबेडकरांनी नागपूर येथे आयोजित शिष्यवृत्ती परिषद या कार्यक्रमात म्हटले आहेत.
नागपुरमध्ये शुक्रवारी अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत उपस्थितांना आंबेडकर मार्गदर्शन करत होते.
आंबेडकर म्हणाले की, मी प्रथमपासूनच मराठा आरक्षणाच्या बाजुने आहे. मात्र एक काळ असा होता की अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांचे मोर्चे निघायचे त्यावेळी मराठा समाजाचे लोक आम्हाला ‘सरकारी जावई’ म्हणून चिडवायचे मात्र आता काळ बदलला आहे. जे आम्हाला एकेकाळी ‘सरकारी जावई’ म्हणायचे तेच ‘सरकारी जावई’ झाले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
आरक्षणाविषयी आपले मत व्यक्त करताना जातीवर आधारित आरक्षणाचे आंबडेकर यांनी समर्थन केले. ते म्हणाले, जो पर्यंत शिक्षणातील विषमता दुर होत नाही आणि सरकार शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आरक्षणाशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्रातील युती सरकारवर देखील आंबेडकर यांनी टिका केली. महाराष्ट्रातील सरकार हे सर्वात प्रतिगामी सरकार आहे. केंद्राकडून शिष्यवृत्तीची जेवढी रक्कम दिली जाते त्यात महाराष्ट्रातील सरकार काहीच भर घालत नाही. इतर राज्य सरकारे मात्र जेवढी रक्कम केंद्र सरकार पाठवते तेवढीच रक्कम स्वत:ही देतात.
ओबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. या सरकारच्या काळात शिष्यवृत्ती मिळेल, याची खात्री नाही. त्यामुळे आरक्षण आणि शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपले सरकार सत्तेत येणे गरजेचे असल्याचेही आंबेडकर म्हणाले.