नागपूर बहुजननामा ऑनलाईन – आरक्षित जागांवर निवडून गेलेले प्रतिनिधी गुलाम आहेत. त्यांच्याकडून आपल्या समस्या सोडविल्या जाऊ शकत नाहीत. समस्या सोडवायच्या असतील तर शासन आपल्या हातात असायला हवे. एक किंवा दोन माणसं शासनात पाठवून काहीच होणार नाही. त्यासाठी शासनात ५० पेक्षा जास्त माणसे पाठवावी लागतील. एससी, एसटी, ओबीसी, व्हिजे एनटी सत्तेत आले तर कुणाला मदत मागण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे.हे नियोजन देशाचे संविधान वाचवू शकते. त्यासाठी आपली सत्ता मिळवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. संजीवनी ह्यूमन डेवलपमेंट संस्था, आदीवासी विद्यार्थी संघ, बहुजन विद्यार्थी संघ, युवाज वुई विथ युथ आदी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्कॉलरशिप परिषदेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, गेल्या ४० वर्षांत आपण स्कॉलरशिपचा विषय सोडवू शकलो नाही. १९७२ पासून जे बोलले जाते तेच आजही बोललेजाते. परंतु या समस्यांवर उपाय सुचविले जायचे. ती परिस्थिती आज नाही. त्याबरोबरच शासन शिक्षणाची जबाबदारी घेत नाही. तोपर्यंत आरक्षण आणि स्कॉलरशिप मिळायला हवी. राज्य सरकार हे सर्वाधिक प्रतिगामी आहे. अशी टीकाही त्यांनी केली. तर केंद्र जितकी स्कॉलरशिप देते त्यात राज्य सरकारचा कुठलाही हिस्सा नसतो. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले होते. हे सर्वांनाच माहित आहे. परंतु का केले. हे कुणीही सांगू शकत नाही. विदर्भ हे देशातील शोषित वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे केंद्र ठरू शकते. त्यामुळे ते आंबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकते असे ते म्हणाले. तर भाजपला हरविण्यासाठी कॉंग्रेसला मत द्यावे असे नागपूरच्या जनतेला वाटते. परंतु आपण २८ टक्के आहोत. इतर समाजाला सोबत घेतले तर आपणच इथले सत्ताधारी होऊ शकत नाही. असे तुम्हाला वाटत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
आपण चित्रकार आहोत, निर्माते नाही अशी टीका केली जाते. त्यामुळे आपल्याला निर्मात्यांच्या भूमिकेत यायला पाहिजे. स्कॉलरशिप हा मुद्दा विद्यार्थ्यांशी निगडीत आहेत. ती मिळायलाच हवी. परंतु जे विद्यार्थी होऊ शकले नाहीत. त्यांचाही विचार करावा लागेल. सर्वांना शिक्षण मिळायला पाहिजे. ते विद्यार्थी कसे होतील हे पाहावे लागेल. असेही ते म्हणाले. यावेळी समता सैनिक दलाच्या अड. स्मिता कांबळे, आदीवासी विकास संघाचे विलास उईके, डॉ. आंबेडकर नॅशनल स्टुडंट फ्रंटचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे, ओबीसी एकता मंचचे अध्यक्ष सुनील पाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अतूल खोब्रागडे यांनी आपले मत मांडले.