नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकाविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 25 वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत संवाद साधला. या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुढाकार घेत थेट मैदानात उतरले आहेत. कृषीमंत्री तोमर यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल पत्र देत पंतप्रधानांनी मराठीमध्ये ट्वीट करत शेतकऱ्यांनी ते पत्र वाचावे असे आवाहन केले आहे. कृषीमंत्र्याचे ते पत्र मराठीत भाषांतरीत केले आहे. मराठी बरोबरच इतर प्रादेशिक भाषांमध्येही पंतप्रधानांनी ट्वीट करत शेतकऱ्यांशी संवादाचा प्रयत्न केला आहे.
कृषी मंत्री @nstomar जी यांनी शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, विनम्र संवादाचा हा प्रयत्न आहे. सर्व अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र जरूर वाचावे.
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2020
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी मध्यप्रदेशातल्या शेतकऱ्यांशी बोलताना हात जोडून विनंती केली होती. विरोधी पक्षांनी त्याचे श्रेय घ्यावे मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. कृषिमंत्र्यांनी लिहिलेल्या भावनिक पत्रात त्यांनी सर्व आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण स्वत: शेतकरी असून शेतात काम करण्यापासून ते माल विकण्यापर्यंत सर्व गोष्टींचा अनुभव असल्याच त्यांनी सांगितले. तसेच MSP आणि APMCला कुठलाही धक्का लागणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. आता या पत्राचे सर्व भाषांमध्ये भाषांतर केले असून ते पत्र देशभर पोहोचवावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.