मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Nana Patole । राज्यात तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाली. मात्र तेव्हापासून आघाडीत काहीतरी धुसफूस होताना दिसत आहे, परंतु, आता तर उघड टीका-टिपणी होत आहे. मागील काही दिवसापासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा गंभीर आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे आता एक नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांनी लोणावळा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना असं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले (Nana Patole) हे लोणावळ्यात काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना असं वक्तव्य केलं आहे. त्यावेळी बोलताना पटोले म्हणाले, ‘सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे, पुढे ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबाबत (Phone tapping) मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद आणि गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, असं देखील पटोले यांनी म्हटलं आहे.
पुढे नाना पटोले म्हणाले, ‘स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार, असा देखील जोरदार आरोप पटोले यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे. आयबीचा अहवाल रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी 9 वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथं आहे याचाही रिपोर्ट गेला असेल. रात्री 3 वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला होता.
अजित पवार यांच्यावर निशाणा –
‘आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात, आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही
ते त्यांनी ठरवायचं, कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना
पटोले यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला. ‘ज्या लोकांना तडजोड करायची नसेल,
सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग
आपल्याला ताकद बनवायचा आहे, असं नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं होतं.