बहुजननामा ऑनलाइन टीम – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला असून नाना पटोले यांचे नाव निश्चित समजले जात आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर रिक्त विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून संग्राम थोपटे, सुरेश वारपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये जोपर्यंत अधिकृत प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत स्पष्ट भूमिका केली जात नाही, तोपर्यंत अशा चर्चांना फारसा अर्थ नसतो, असे मत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.
आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे आमदार म्हणून भोर मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे थोपटे समर्थकांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे थोपटेंना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यानंतर सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. वारपूडकर हे पाथरीतून निवडून आले असून 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केल आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अमीन पटेल हे मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातील असून आमदार म्हणून त्यांची ही तिसरी टर्म आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.