बहुजननामा ऑनलाइन टीम – संपूर्ण जगात आज जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा या दिनानिमित्त आय एम अँड आय विल हा जनजागृतीपर संदेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरापासून ते स्थानिक स्तरापर्यंत सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करा, कर्करोगाचा धोका टाळण्याचे आवाहन कऱण्यात येणार आहे. दरम्यान, जगात कर्करोगामुळे प्रत्येक मिनिटाला १७ व्यक्तींचा मृत्यू होत असतो. त्याबरोबरच कर्करोगामुळे होणाऱ्या जगातील एकूण मृत्यूच्या संख्येत सहा टक्के मृत्यू हे देशातील आहेत. यापूर्वी, नोंदवलेल्या निरीक्षणानुसार जगात असणाऱ्या कर्करोग रुग्णांच्या पाच पैकी एक रुग्ण हा देशातील आहे. याचे प्रमाण आता चारवर आले आहे.
या संदर्भात बोलताना कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनुप ताम्हणकर म्हणाले, कर्करोग टाळण्यासाठी निरोगी जीवनाचा अवलंब केला पाहिजे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार व वजन नियंत्रणात ठेवने आवश्यक आहे. पौगंडावस्थेतील २० ते ३० टक्के लोकांना लठ्ठपणाने प्रभावित केले आहे. लठ्ठपणामुले आतड्यांसंबंधी, स्तन, गर्भाशय, स्वादुपिंड, आणि पित्ताशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
स्त्री कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र केरकर म्हणाले, जननेंद्रियाची अस्वच्छता, कमी वयातील लैंगिक संबंध, एकापेक्षा अनेक पुरुषांसोबत असलेला लैगिक संबंध, आदी गोष्ठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) सारख्या विषाणूंच्या संक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील १० ते १५ वर्षांत त्याचे रूपांतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगात होते. चिंताजनक बाब म्हणजे अशा प्रकारचा कर्करोग हा ३५ ते ४५ वयोगटात आढळून येत आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका २.४ टक्क्यांनी वाढला
भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. जगातील या कर्करोगाची रुग्णसंख्या पाहता २० टक्के रुग्ण हे भारतातच आढळून येतात. स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग असून २०२० मध्ये अशा प्रकारच्या कर्करोगामध्ये दर १०,००,००० महिलांमध्ये २२ नवीन प्रकरणांचे निदान झाले आहे. त्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका २.४ टक्क्यांनी वाढला आहे.