नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – फेब्रुवारी २०१७ मध्ये अमानुष प्रकारे झालेल्या कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी या मागणीसाठी पत्रकारांनी शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन केले. यानंतर पत्रकार संघर्ष कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण यांना एक निवेदनही देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी उषा कांबळे आणि त्यांची अडीच वर्षांची नात राशी कांबळे या आजी नातीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी आरोपींनी हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅट्रॉसिटी अॅक्टही या प्रकरणात लावण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त (एसीपी) किशोर सुपारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
मात्र, तपासादरम्यान सुपारे यांनी संशयास्पद भूमिका घेत हत्याकांडातील आरोपींना फायदा होईल, अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून चौकशीची सूत्रे काढून तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ती एसीपी राजरत्न बन्सोड यांच्याकडे सोपविली होती. या संबंधाने फिर्यादी रविकांत कांबळे यांनी एसीपी सुपारेविरुद्ध पोलीस आयुक्तांसह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. मात्र सुपारेंविरुद्ध कोणतीही कडक कारवाई झाली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी शुक्रवारी आंदोलन केले.