कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – नाभिक हा समाजाची सेवा करणारा समाज आहे. हा समाज आपल्या हक्कासाठी संघटित होतांना दिसत आहे. खरोखर ही चांगली बाब आहे. शिवकालीन इतिहासामध्ये त्यागाची परंपरा असूनही शासन दरबारी गेली अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेल्या या समाजाच्या उन्नतीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असे प्रतिपादन साई उद्योग समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील-कौलवकर यांनी केले.
आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी येथे नाभिक समाजाच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष पिंटू संकपाळ होते. स्वागत व प्रास्ताविक नाभिक समाजाचे राज्य उपाध्यक्ष एम. आर. टिपुगडे यांनी केले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ज्या समाजामध्ये एकसंधपणा नाही, तो समाज विकासापासून वंचित राहिला आहे. एकी ही समाजाची मोठी ताकद आहे. राजकारणी निवडणुकीत मतासाठी वापर करत असतात. विकासाची स्वप्ने दाखवून वापर केला जात आहे. अशा बिनकामी राजकर्त्याना त्यांची जागा दाखवा, असेही ते म्हणाले.