बहुजननामा ऑनलाईन टीम – आयसीआयसीआय लोम्बार्डच्या वतीने ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा भरपाई मिळालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या ३१ जुलैपर्यंत लाभ देण्याचे आश्वासन शिवसेनेला देण्यात आले. बुधवारी शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाईबाबत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्सवर मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेनेच्या या दणक्याने कंपनीचे अधिकारी हादरून गेले.
विविध प्रश्नांबाबत जाब शिवसेनेच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. यामध्ये पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाहीत. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे अद्याप का दिले नाही ? किती शेतकऱ्यांना अद्याप भरपाई देण्यात आली ? किती शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली नाही ? त्याची करणे काय ? असे प्रश्न कंपनीला विचारल्यानंतर अधिकाऱ्यांनी ८ दिवसात ३४ कोटी रुपये रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. यात हिंगोली, जालना, अकोला, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार या जिह्ल्यातील अनेक शेतकऱ्यांनी हफ्ता भरून देखील त्यांना विम्याची रक्कम कंपनीकडून दिली जात नसल्याने शिवसेनेने हा मोर्चा काढला होता.
यावेळी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनीवर शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर आणि विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर यासंबंधातील लेखी आकडेवारी देण्याची मागणी ही कंपनीकडे करण्यात आली. येत्या आठ दिवसात सांगितल्या प्रमाणे कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिली नाही तर शिवसेना स्टाइलने पुन्हा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.