ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे विधान केले आहे. त्यावर आ. जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर ही त्यांच्याच परिवारातील दहशतवादी नथुराम गोडसेला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देऊन मोकळी झाली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर आणि नथुराम यांच्यात रक्ताचे- परिवाराचे-जातकुळीचे- भावबंदकीचे नाते आहे. त्यामुळेच तिने हे विधान केले आहे. मात्र, हेमंत करकरे यांच्याबाबत अतिशय खालच्या दर्जाचे विधान करणार्या प्रज्ञासिंहचे समर्थन करण्यासाठी नरेंद्र मोदी पुढे आले होते. आता मोदींची आपली काय भूमिका आहे ते जाहीर करावे;
जगाला दाखवण्यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणारे मोदी हे प्रज्ञा ठाकूरच्या समर्थनार्थ त्यावेळी उतरले होते. आत खरंच नथुराम गोडसे राष्ट्रभक्त होता का? हे मोदींनी भारताला नाही तर जगाला सांगावे, असे आव्हान आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे .