पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारत हा तरुणांचा देश आहे आणि देशातील युवावर्गाला सुशिक्षित करणे गरजेचे आहे. कारण शिक्षण हे कुरूप गोष्टीलाही सुंदर व प्रत्येकाला आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी बनविते. त्यामुळेच त्याला किमान वेतन मिळविणे शक्य होते व त्याच्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त होते. सुशिक्षित युवकांनी राजकारणात यावे, असे विचार पंजाबचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते युवकांशी संवाद साधतांना बोलत होते. या प्रसंगी भारतीय युवक कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख अॅड. कृष्णा अलावारू, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, पंजाब प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गौतम सेठ, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते.
सिद्धू म्हणाले, मतपेटीच्या गर्भातूनच येणाऱ्या निवडणुकीतून या देशाचा राजा कोण बनतो हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. येथे जनतेचा आवाज हा ईश्वराचाच आवाज आहे. प्रत्येक निवडणूक ही बुलेट नाही, तर बॅलेटच्या आधारेच होणार आहे. त्यामुळे मतदार हेच देशाचे खरे शिल्पकार आहेत.
लोकशाहीची निर्मिती ही शांती आणि सुरक्षेसाठी झाली आहे. त्यामुळे येथे जनतेचा निर्णय हाच अंतिम असतो. देशात युवकांच्या आधारे धोरण ठरविले जाणे अत्यंत आवश्यक आहे. राजकारणातील वाढत जाणाऱ्या भ्रष्टचाऱ्यामुळे ते दूषित झाले आहेत. हे माध्यम पैसे कमविण्याचे साधन बनले आहे. त्यामुळेच जनेतच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.