बंगळुरू : बहुजननामा – मॉब लिंचिंगच्या विरोधात कर्नाटक येथील प्रसिद्ध रंगभूमी कलाकार,नाटककार आणि दिग्दर्शक एस. रघुनंदन यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला आहे. त्यांना पुरस्कार देण्याची घोषणा मंगळवारी १६ जुलै रोजी केली होती. देशभरात देवाच्या नावावर मॉब लिंचीग आणि बुद्धिवाद्यांचा आवाज दाबला जात असल्याचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हा पुरस्कार नाकारताना त्यांनी निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी देशभरात पसरविल्या जाणाऱ्या अविवेकी वातावरणाची निंदा केली आहे. कन्हैया कुमार सारख्या युवकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अडकविणे असो की UAPA कायद्याचा गैरवापर करीत बुद्धिवादी लोकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न असेल या सर्व घटनांची त्यांनी निंदा केली आहे.
काय म्हणाले निवेदनात ?
पुरस्कार परत करणे म्हणजे निषेध नाही तर निराशेतून आलेली असमर्थता आहे. देव आणि धर्माच्या नावावर मॉबलिंचिंग केले जात आहे आणि एवढेच नाही तर खानपानाच्या पद्धतीवरून माणसांना मारले जात आहे. मॉब लिंचिंगमुळे होणाऱ्या हत्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सत्ताधारी जबाबदार आहेत. ते अशा हत्यांचा अप्रत्यक्षरीत्या समर्थन करत आहेत.
या लेखकांनी केले समर्थन
त्यांनी उचललेल्या या पावलाचे विविध लेखकांनी समर्थन केले आहे. समर्थन करणाऱ्या लेखकांत गणेश देवी, सच्चिदानंदन, केकी दारूवाला, अशोक वाजपेयी, नयनतारा सहगल आणि गीता हरिहरन या प्रसिद्ध लेखकांचा समावेश आहे.