मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आगामी निवडणुकीत मनसे 100 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. आजच कृष्णकुंजवर राज ठाकरेंनी बैठक घेतली आहे. राज ठाकरे आणि विभाग प्रमुखांच्या या बैठकीत राज ठाकरे यांनी नेत्यांना तयारी लागण्यासाठी आदेश दिले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक, सोलापूर, हिंगोली, पुणे, मुंबई, पंढरपूर आणि औरंगाबादमधून मनसे रिंगणात उतरणार आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांची यादीही मागवली असल्याचे समजत आहे. सूत्रांचं म्हणणं आहे की, मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण स्वबळावर निडवणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. एक दोन दिवसांतच ते याबाबत आपला निर्णय जाहीर करू शकतात असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेच्या नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं समोर आलं होते. गेल्या आठवड्यात मनसेची याबाबत बैठकही पार पडली होती. परंतु यात कोणताही निर्णय झाला नव्हता. आजच्या बैठकीत मात्र आगामी निवडणुकीसाठी मैदानात उतरण्यावर सर्वांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Visit : bahujannama.com