बहुजननामा ऑनलाइन – खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले होते. त्यावर महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा आधीपासूनच ’जिधर बम, उधर हम’ असा स्वभाव असल्याचे म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सपशेल फेल झाली असून अनेक जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावतो आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी राणा यांनी लोकसभेत केली होती. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधून घरात बसून माझं कुटुंब माझी जबाबदारी हे कसे साध्य होणार असा सवाल उपस्थित केला होता. यावर पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, खासदार नवनीत राणा यांचे काम शून्य करायचे आणि प्रसिद्धीसाठी त्यांना ओढ लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा ह्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवश्यावर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी लगेच रंग बदलला. त्यांचा स्वभावच आधीपासूनच ’जिधर बम, उधर हम’ असा आहे. आणि विशेष म्हणजे नौटंकी जिथे करायची तिथेच खासदार नवनीत राणा असतात, असं ठाकूर म्हणाल्या आहेत.