जालना : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात आरक्षणावरुन राजकारण चांगलेच ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे. मंत्रीपद गेले तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असे विधान मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना वड्डेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार वड्डेट्टीवार म्हणाले की, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचे आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेले तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तसेच ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू, असे वड्डेट्टीवार यांनी बजावले आहे.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. अशातच काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेत्यांकडूनही बैठका सुरु आहेत. मात्र औरंगाबादच्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. वड्डेडीवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजीत ओबीसी मेळाव्यात प्रास्ताविकामध्ये छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अखेर मंत्री वड्डेटीवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्त्ये शांत झाले आणि मेळावा पार पडला.