परभणी : बहुजननामा ऑनलाइन – तथागत भगवान बुध्दांनी दिलेला करूणा, अहिंसा व शांततेचा मार्ग सर्व मानव जातीसाठी कल्याणाचा आहे. त्यामुळे धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार व प्रसार होतो. यातून धम्म चळवळ पुढे गेली पाहिजे, असे प्रतिपादन पूर्णा येथील भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केले. पूर्णा शहरात आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या दोन दिवसीय धम्म परिषदेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
परिषदेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये सकाळी बौध्द विहारात परित्राण पाठ, सामूहिक वंदना घेण्यात आली. त्यानंतर शहरातून भिक्खू संघासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुध्दांच्या प्रतिमेची धम्म मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी ४ वाजता परिषदेचे उद्घाटन के. संघरक्षित महाथेरो (जमशेदपूर, झारखंड) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर भिकू संघ, श्रामनेर संघ, भदंत संघपाल, भदंत बोधीधम्मा, भदंत पय्याबोधी, भदंत बोधीपालो महाथेरो, भदंत शिलरत्न यांच्यासह नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे, डॉ.एस.पी.गायकवाड यांची उपस्थिती होती. नगरसेवक उत्तम खंदारे, मधुकर, प्रकाश कांबळे, धम्मा जोंधळे, साहेबराव वाटोडे, लक्ष्मण शिंदे, सभापती अशोक बोखारे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, जि.प.सदस्य भरत घनदाट, माजी पं.स.सदस्य रितेश काळे, श्याम जोगदंड, गंगाधर बुचाले, राजू नारायणकर, यशवंत उभारे, ॲड. महेंद्र गायकवाड, एन.डब्ल्यू.गायकवाड, दिलीप गायकवाड, अशोक कांबळे, त्र्यंबक कांबळे आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर लुंबिनी स्मरणिकेचे प्रकाशन के संघरक्षित महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. तर भिक्खू संघाचे उपासक-उपासिका आणि स्वागत केले. यावेळी बोलताना भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले की, पूर्णा शहर हे चळवळीचे शहर आहे. या शहराला धम्माचा मोठा वारसा असून येथील बुध्दविहारातून धम्मकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे धम्माचा प्रसार व प्रचार झाला आहे. त्यामुळे अनेक बुध्दविहार उभे राहताहेत. उपासकांच्या देणग्या व दानातून बुध्दविहारे उभारली जात असून यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले. या परिषदेला मार्गदर्शन करताना उद्घाटक के. संघरक्षित महाथेरो म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात धम्म चळवळ पुढे असून त्यासाठी उपगुप्त महाथेरो यांचे कार्य महान आहे. यावेळी त्यांनी उपासकांना ज्ञानाच्या आधारावर व्यवहार केला पाहिजे, असे सांगितले. परिषदेला उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिषदेचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.