ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – मराठी राज्य भाषा असली तरी तिचा वापर फारच कमी प्रमाणात होत असतो. राज्याच्या अखत्यारीतील शासकीय कार्यालये वगळता केंद्राच्या किंवा अन्य कोठेही गेला किंबहुना राष्ट्रीय बँकेत गेलो तरी आपल्याला इंग्रजी किंवा हिंदी भाषेचा वापर करावा लागतो. मात्र आता केंद्राच्या सर्वच कार्यालयात राज्य शासनाने इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीची सक्ती केली आहे.
स्थानिक भाषा म्हणजे मराठी भाषेचा वापर न करणारे कार्यालय जिल्ह्यात आढळल्यास त्याच्या प्रमुखास निमंत्रक करून त्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे लक्षात आणून देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी भाषा संचालनालयास अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.
त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या राज्य भाषा विभागाने हिंदी व इंग्रजीबरोबर प्रादेशिक मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.