नवी दिल्ली : वृत्त संस्था – प्रसारमाध्यमातील लोकांनी पाठलाग केल्यामुळे अपघात होऊन प्रिन्सेस डायना( Princess Diana) 1997 मध्ये मरण पावली होती. तसा प्रकार आपल्या देशात होऊ नये असे दिल्ली उच्च न्यायालयाने (delhi high court) प्रसारमाध्यमांना बजावले आहे. बॉलीवूडमधील मंडळींची (Bollywood celebrities) बदनामी करणारा कोणताही कार्यक्रम दाखवू नये असा आदेश देत न्या. राजीव शकधर यांनी टाइम्स नाऊ व रिपब्लिक टीव्ही या दोन (times now, republic tv) वृत्तवाहिन्यांना फटकारले आहे.
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील इतर मंडळींवरही काही आरोप झाले होते. त्याची चर्चाही झाली होती. या घटनांच्या वार्तांकनाप्रसंगी काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत बॉलीवूडमधील दिग्गजांनी करत थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामध्ये आमीर खान, शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार, करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदींचा समावेश आहे.
समांतर न्यायालय बनू नका (Parallel Court)
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. राजीव शकधर यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांनी समांतर न्यायालय बनू नये. प्रसारमाध्यमांचे काम हे बातम्या देण्याचे असते. मात्र सध्या दिल्या जाणा-या बातम्या बातमी कमी व त्यात स्वत:ची मते अधिक अशा पद्धतीने दिल्या जात आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल आधीच निष्कर्ष काढून मग त्या अंगाने बातम्या दिल्या जातात असेही दिल्ली न्यायालयाने वृतवाहिन्यांना फटकारले.