मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मुद्द्यावरुन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजी राजे यांनी यावेळी सरकारसमोर ५ मागण्या ठेवल्या. तर त्यापूर्ण करण्यासाठी ६ जूनपर्यंतचा वेळ दिला आहे. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. पण त्यांना खरी भेट ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“खासदार संभाजी राजे हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. ते एक महत्वाचे नेते सुद्धा आहेत. मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांना खरी भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट झालंय”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation भूमिकेबाबत संभाजी राजेंच्या भूमिकेशी सहमत असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची संभाजी राजे यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर आज ते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहेत.