बहुजननामा ऑनलाइन टीम – मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कमी पडलं असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ही स्थगिती तीन न्यायाधीशांच्या समीतीनं दिलीय आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून जोवर स्थगिती उठवली जात नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील. आम्ही नियोजनपूर्वक स्टॅटेजीने कोर्टात जायचो, कोर्टात सुनावणीत कायम सतर्क रहावं लागतं, असंही फडणवीस यांनी म्हटले.
मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांनी सांगितलं की, राज्य सरकार कमी पडतंय. हा माझ्याकरता राजकारणाचा मुद्दा नाही. आपण यात मार्ग काढला पाहिजे, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण कंस मिळेल हे पहायला हवं, असंही ते म्हणाले. आपण कुठेतरी कोर्टात सांगण्यात कमी पडलो आहोत, ते कोर्टाला समजावून सांगावं लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली मध्ये आहेत दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ खडसे, राज्यातील कोरोना, कंगना राणौत अशा विविध विषयांवर भाष्य केलं.
MIDC प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागला
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आज (शुक्रवार) देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ खडसे यांना मनीष भंगाळे प्रकरणात नाही तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांच्या आरोपांबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत. पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागलेला नाही. त्यांना एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात त्यांना क्लिन चीट आहे. त्यांच्यावर कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला. जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.