नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.
बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिल साठीची जागा ही देवस्थानची असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी या प्रकरणावर आज सुनावणी झाली.
तरी पोलिसांनी पहाटेच बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर आज सकाळी दाखल झालेल्या गुन्ह्यालाही आता स्थगिती मिळाली आहे.या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून अखेर सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.