बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यातील सत्ता संघर्षाच्या दृष्टीकोनातून शनिवारीचा दिवस सर्वात मोठं होता. अजित पवार आणि फडणवीस यांनी एकत्र येत सरकार स्थापनेचा दावा केला आणि सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकला. मात्र अजित पवारांच्या या भूमिकेबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. काही आमदारांच्या पाठिंब्याने अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, याच पार्श्वभूमीवर आमदार फुटण्याच्या कारणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
दरम्यान, आता या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (रविवारी) सुनावणी होणार आहे. दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजही तीन प्रश्न अनुत्तरीत असून यांची उत्तर जनेताला कधी मिळणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी नव्या सरकारपदी शपथ घेतली, पण दोन्ही नेते ३० नोव्हेंबरपूर्वी बहुमत सिद्ध करू शकणार आहेत का? जर बहुमत सिद्ध करू शकले तर ते कसं? तसेच अजित पवारांसोबत ११ आमदार होते. मात्र या आमदारांनी पुन्हा शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तर भाजपकडे १०५ आमदार आणि १५ अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी २५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज. त्यामुळे बहुमत खेचून आणण्यासाठी कोणता मास्टर प्लॅन आहे? याकडे सर्वांचं लक्ष आहेच.
दरम्यान, भाजपने अजित पवारांसह स्थापन केलेलं सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा महाविकासाआघाडीच्या तिन्ही पक्षांनी केला. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यानंतर महाविकासआघाडी विधिमंडळ अध्यक्ष निव़डीसाठी निवडणूक घेणार असल्याचं समजते. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे.
सत्ता संघर्षाच्या पेचात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडी सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे या तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.