बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पोलीस प्रशासनाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय ताणतणावात वाढ झाली असल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगाला सादर केला आहे. यापुर्वी हिंदू मुस्लिम समाजात ताणतणाव होता मात्र गेल्या पाच वर्षांच्या काळात सवर्ण – अनुसूचित जातींमधील संघर्षात वाढ होत असल्याच या अहवालात म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. १८) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पोलीस प्रशासनाने दिलेल्या अहवालात राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरण केले. ज्यामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावापेक्षा मागील पाच वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव वाढला असल्याचे सांगितले. तसेच, हिंदू-मुस्लीमांमधील तणावासाठी राज्यातील आठ जिल्हे संवेदनशील म्हणून पोलिसांनी निवडले आहेत. तर त्या तुलनेत सवर्ण-अनुसूचित जातींमधील समाजात तणाव असलेल्या १४ जिल्ह्यांची नोंद त्यांनी संबंधित अहवालात केली आहे.
यात पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावासाठी संवेदशील आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि पूर्व विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यांत सवर्ण आणि अनुसूचित जातींमध्ये तणावाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र पोलिसांच्या आकडेवारीवरुन फडणवीस सरकारच्या काळात जातीय संवेदनशीलता वाढली असल्याचे दिसत आहे.
राज्यात मागील चार वर्षात जातील तणावाच्या घडलेल्या घटना
१. २०१६ – अदखलपात्र घटना – ५२१६, दखलपात्र घटना- २४८४
२. २०१७ – अदखलपात्र घटना – ५७५५ दखलपात्र घटना- २४०७
३. २०१८ – अदखलपात्र घटना -६४३४ दखलपात्र घटना- २४८५
४.२०१९ – अदखलपात्र घटना -३२९३, दखलपात्र घटना- १२६५ (जुलै पर्यंत)
Visit : bahujannama.com