मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या करणामामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. या सर्व घडामोडीवरून पोलीस आयुक्तांनी तब्बल ६४ बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या करून मुंबई गुन्हे शाखाच मोकळे करून टाकले. यावरून पोलिसांच्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. तर या सर्व प्रकरणाचा पोलिसांनी धसका घेतला असून, एकवेळ साईड ब्रँच चालेल पण क्राईम ब्रँच नको अशी मानसिकता त्यांची दिसून येत आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस दलात पुनरुत्थान मिळाल्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दोन पीआय पदावरील पोलीस अधिकाऱ्याला हटवले आणि सहायक पोलीस निरीक्षक (API) असलेले सचिन वाझेला क्राईम ब्रँचच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख केले. सचिन वाझेने CIUची सूत्रे हातात घेतली त्यानंतर अनेक सर्व महत्त्वाची प्रकरणे तपासासाठी वाझे यांच्याकडेच देण्यात आली. यामुळे गुन्हे शाखेच्या इतर अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. काही कालावधीने सचिन वाझेने नको ते कृत्ये केले आणि त्यामुळे पोलीस दलाची नाहक बदनामी होऊ लागली.
तसेच, परिणामी तत्कालीन पोलीस महासंचालक तथा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेमधील अधिकाऱ्यांच्याच बदल्या करून टाकल्या. त्यात आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि ज्यांचा गुन्हेगारांवर चांगला धाक आहे अशाही अधिकाऱ्याची बदली केली. यामुळे पोलीस दलातून नाराजी व्यक्त होत असून असे होणार असेल तर क्राईम ब्रँच नको. त्यापेक्षा साईड ब्रँच चालेल असे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी खासगीत चर्चा करू लागले आहेत.