बहुजननामा ऑनलाईन
अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने इतर व्यवहार सुरू केले आहेत. परंतु, मंदिरे उघडण्यासाठी मागण्या आणि आंदोलने करूनही सरकार दखल घेत नाही. मोठी मंदिरे असलेल्या गावातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचे गांभीर्य सरकारने लक्षात घ्यावे. या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी, असा टोला भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील महाविकास आघाडी सरकारला लगावला.
13 ऑक्टोबरच्या उपोषणाला भाजपाचा पाठींबा
राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवरानगर येथे पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात ते म्हणाले, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधु-संत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना 13 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला भाजपा पाठिंबा देणार आहे.
विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्यात मंदिरे उघडण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाली. तरीही भाविकांच्या भावना समजत नसतील, तर बंद मंदिरांमुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेवून राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा. परंतु, ठाकरे सरकार याबाबतीत हट्टीपणा का करत आहे, तेच समजत नाही.
केंद्राच्या निर्णयाचे केले कौतूक
विखे पाटील यांनी केंद्र सरकारने साखर उद्योगासंबंधी घेतलेल्या निर्णयाचे कौतूक केले. ते म्हणाले, इथेनॉल उत्पादन आणि साखर विक्रीचे दर निश्चित करण्याचे केद्र सरकारने घेतलेले धोरण क्रांतिकारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन वाढविण्यास तसेच याबाबत दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
विखे पाटील पुढे म्हणाले, पूर्वी इथेनॉल उत्पादन होत असले तरी होणारे करार हे मर्यादित होते. आता इथेनॉलच्या किंमती निश्चित करतानाच 5 वर्षांच्या दीर्घ करारांना परवानगी दिली आहे. यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. साखरेचे विक्री मूल्य सुद्धा निश्चित करण्यासाठी केद्र सरकारने पाऊल टाकले असून हे पाऊल क्रांतिकारी आहे, असे ते म्हणाले.