बहुजननामा ऑनलाईन टीम – विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. निवडणूक निकालानंतर ५० -५० फॉर्मुल्यावर शिवसेना अडून बसली होती. मात्र भाजपने शिवसेनेच्या या मागणीला मान्य कारण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात सरकार स्थापन केलं. मात्र या सत्तानाट्यात अनेक ट्विस्ट निर्माण झाले.
भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सत्तास्थापनेसाठीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना राज्यातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी रात्रीतून पक्षाविरुद्ध बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर फडणवीस सरकार अवघ्या ८० तासात पडलं. कारण अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या भाजपने सत्ता स्थापन केली होती, मात्र अजित पवारांनीच वैयक्तिक कारण देत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मात्र, ज्या अजित पवारांवर भाजपने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, त्याच अजित पवारांसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यात ही सत्ता टिकवताही न आल्याने भाजपचं चागलंच हसू झालं. या सगळ्या नाट्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
“दोन दिवस आधी ही चर्चा झाली. काही फिलर्स जात होते. आमच्या नेतृत्वाच्या स्तरावर काही गोष्टी घडत होत्या. पण स्पष्ट चर्चा अशी झालेली नव्हती. तसेच २२ तारखेला रात्री ज्या वेळी या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमच्याकडे आले, आणि काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना या तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं, त्या वेळी आम्ही सरकार स्थापनेची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचं मतही तसंच आहे, असे देखील अजित पवार म्हंटले होते.
दरम्यान, आम्ही त्यांच्याबरोबर जायला हवं की नको यावर वाद होऊ शकतात, पण त्या वेळी तो गनिमी काव्याचा डाव होता, असं म्हणता येईल. पण तो डाव फसला,” असं देवंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत मान्य केलं आहे.