मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. हा निर्णय राज्य सरकारने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून सोमवारी घेतला. दरम्यान, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? असा उपरोधिक सवालही विरोधक विचारत आहे. विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते. या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
दरम्यान, नववर्षांच्या सुरुवातीला शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत होती. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले. या पार्श्वभूमीवर, रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रविवारी दुपारी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी वा रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळली होती. परंतु ब्रिटनमधील करोनाचा नवा प्रकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
तशी वेळही येऊ नये… उद्धव ठाकरे म्हणाले
“दोन दिवसांपासून संचारबंदी सुरु आहे. अनेकजण कोरोना रात्री मोकाट फिरतो आणि दिवसा घऱात बसतो का? अशी विचारणा करत आहेत. तसं नाहीये….जनतेला थोडीशी जाणीव करुन द्यायची गरज असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे. दिवसा आपण लॉकडाउन करु शकत नाही. तशी वेळही येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. अनावश्यक गर्दी टाळणं हे जास्त महत्वाचं आहे”.
जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध
राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६पर्यंत संचारबंदी लागू राहील. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार असून, विशेषत: हॉटेल व्यवयासाला त्याचा मोठा फटका बसेल, असे मानले जाते. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत.
३१ डिसेंबपर्यंत ब्रिटन-भारत विमानसेवा बंद
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर तपासणी करण्यात येईल. त्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. कॅनडा, बेल्जियम, इटली आणि इस्रायल आदी देशांनी ब्रिटनशी हवाई वाहतूकसेवा आधीच खंडित केली आहे. ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. भारत आणि ब्रिटनदरम्यानची विमान वाहतूक बुधवारपासून ३१ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हवाई वाहतूक विभागाने सोमवारी घेतला. यामुळे या कालावधीतील सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.