औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र लढलेल्या वंचित आणि एमआयएम यांच्यामध्ये विधानसभेच्या तिकीटवाटपावरून फूट पडली. दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा विचार करून आपापले उमेदवार जाहीर केले. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी युती तोडणारे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी युती तोडली असली तरी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितने एमआयएमचे उमेदवार गफ्फार कादरी यांना पाठिंबा दिला आहे. तसेच कादरी यांना मतदान करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
विधानसभा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नसल्याने एमआयएमने वंचित सोबत असलेली युती तोडून अकेला चलो चा नारा दिला. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी युती करण्याचा प्रयत्न केला मात्र, युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून काही ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार न देता एमआयएमचे उमेदवार कादरी यांना पाठिंबा जाहीर केला. तसे पत्रक आंबेडकर यांनी काढले आहे.
लोकसभेत एकत्र लढलेले हे दोन पक्ष विधानसभेत तिकीटवाटपावरून वेगळे झाले. असे असले तरी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात असे संकेत देण्यात आले होते. असे असताना सुद्धा दोन्ही पक्षांत शेवटपर्यंत युती होऊ शकली नाही. त्यामुळे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. मात्र, औरंगाबाद मध्य मतदारसंघात वंचितने पाठिंबा देऊन न झालेली युती या निमित्ताने दिसून आल्याची चर्चा आहे.
Visit : bahujannama.com