रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाइन – मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथे गोहत्या प्रकरणावरून आंदोलनकर्त्यांविरुद्ध झालेल्या लाठीचाराचा प्रकार खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी बेछूट लाठीहल्ला केल्यानेच हे प्रकरण पेटले. शांतपणे बसलेल्या जमावावर पोलिसांकडून जो लाठीहल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करून विविध मागण्यांसदर्भातील गुहागर तालुक्यातील गोप्रेमी नागरिकांच्या वतीने तहसीलदार गुहागर यांच्यामार्फत राज्यपाल महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, १६ जानेवारी २०१९ रोजी लोटे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना गोहत्या होत असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान दि. २६ जानेवारी रोजी पहाटे पोलिसांसमोर गोहत्या करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे लोटे परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले व शांतपणे बसून होते. त्यानंतर खेड दंडाधिकारी गंभीर हे नागरिकांजवळ बोलणी करत असताना डीवायएसपी नांदेडकर यांनी काही पोलिसांना घेऊन मागील बाजूने लोकांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे जमाव प्रक्षुब्ध होऊन पुढील प्रकार घडला.
तसेच याप्रकरणी डीवायएसपी नांदेडकर यांनी तालुका दंडाधिकारी उपस्थित असताना कोणतीही पूर्वसूचना न देता लाठीहल्ला केला याची चौकशी व्हावी, प्रजासत्ताकदिनी कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या, पण ती पार न पाडणाऱ्या नांदेडकर यांना निलंबित करावे, नागरिकांवर ज्या खोट्या केसेस घातल्या आहेत, त्या तत्काळ मागे घेऊन पकडलेल्या लोकांना सोडून देण्यात यावे, या सर्व प्रकरणाच्या मुळाशी असणाऱ्या गोहत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करण्यात यावी. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी रत्नागिरी, पो. अधीक्षक यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आल्या. या निवेदनावर अनिरुद्ध भावे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, किरण खरे, पत्रकार गणेश किर्वे, ॲड. मंदार आठवले, अपर्णा आठवले, मृणाल गोयथळे, संपदा केळकर, पंकज बिर्जे, प्रदीप बेंडल यांच्यासह अनेक गोप्रेमी नागरिकांच्या सह्या आहेत.