अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – बारावी उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात विविध सवलतींसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तसेच नवीन नोकर भरतीमध्ये तत्काळ लागणाऱ्या कागदपत्रांसाठी चांदूर रेल्वे उपविभागातील विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. त्यात निवडणुकीच्या कामामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र अडकले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष खदखदत होता.
महाविद्यालय प्रवेशात विविध सवलतींसाठी व शासनाने एकापाठोपाठ काढलेल्या नोकर भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र अशा प्रमाणपत्रांची गरज विद्यार्थ्यांना भासत आहे. मार्च महिन्यानंतर या प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करण्याची गरज असते. चांदूर रेल्वे उपविभागातील शेकडो पालक व विद्यार्थी सेतू केंद्रांवर धाव घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्रावर अधिक गर्दी झाल्याचे चित्र दिसते. शेकडो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार असून अधिकाऱ्यांची स्वाक्षरीसाठी विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून अजूनही वाट पहावी लागत असल्याचे काही पालकांनी सांगितले. या स्वाक्षरी न करण्यामागे अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या कामांचे कारण सांगितले जात आहे. निवडणुकीच्या कामासोबतच कार्यालयीन कामासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु असे न झाल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना नोकर भरतीला मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या व्यस्त कामात असतानासुद्धा विविध प्रमाणपत्रावर सह्या करणे सुरू आहे. राहिलेल्या सह्या उर्वरित वेळात मी माझ्या निवासस्थानी गठ्ठे गोळा करून करीत आहे. काही आवश्यक प्रमाणपत्रावर सह्या झाल्या नाही तर अशा नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी माझी प्रत्यक्ष भेट घ्यावी असे उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांनी सांगितले आहे.