बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडीने दिलेली विधान परिषदेतील(Legislative Council) राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कोर्टातच आहे. त्यासाठी घालून दिलेली पंधरा दिवसांची मुदत उलटून गेली तरीही राजभवनाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी बुधवारी (दि. 25) त्यांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी कोश्यारी यांच्याकडे सादर केली आहे. खोत यांनी नवी नावे सुचवल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
राज्यात विधान परिषदेवरील(Legislative Council) राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या 12 जागा रिक्त आहेत. यात विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. त्यानुसार, सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी नावे सुचवण्यात आली आहेत. यात मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे आदी नावांचा समावेश आहे. तसेच खोत यांनी वाढीव वीजबिलाला माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, अशा विविध मागण्या सदाभाऊ खोतांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केल्या आहेत.