बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र मदतीसाठी धावला आहे. अन्न, वस्र आणि जीवनासाठी आवश्यक अशा अनेक गोष्टींची मदत अनेक नागरिक करत आहेत. या पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक योगदान दिले जात असून मुंबईतील गणेश मंडळेही मागे नाहीत. त्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ‘लालबागचा राजा’ मंडळाने २५ लाखांची, तर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळानं ५ लाखांची मदत दिली आहे.
ही रक्कम मुख्यमंत्री निधीत जमा केली जाणार आहे आणि लालबागच्या राजाचे हे मंडळ रायगडमधील जुई गावच्या धर्तीवर एक गाव दत्तक घेऊन त्या गावचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सरकारी यंत्रणांनी मदत घेऊन त्या बाबतची रूपरेषा ठरवण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबईतील गणेश मंडळांनी गणपतीच्या सजावटीवरील अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत द्यावी, असं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. म्हणून नंतर अनेक मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.